इयत्ता तिसरीपासून विद्यार्थ्यांना ATKT चा पर्याय उपलब्ध होणार ? शिक्षण विभाग मोठा निर्णय घेणार.

इयत्ता तिसरीपासून विद्यार्थ्यांना ATKT चा पर्याय उपलब्ध

शालेय शिक्षण विभाग इयत्ता तिसरी पासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांचे मूल्यमापन करण्याच्या निर्णयावर गांभीर्याने विचार करीत आहे. सदर परीक्षा घेत असताना इयत्ता तिसरीपासून अंतिम परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना एटीकेटीचा पर्याय देता येईल का, याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिली. नुकतेच त्यांनी इयत्ता तिसरी पासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय विभागकडून घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी माध्यमांशी बोलत असताना, ‘शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करता येत नाही. यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थी अंतिम परीक्षा देतात. मात्र, अनुत्तीर्ण होणार नसल्याने त्यांच्यामध्ये परीक्षांचे गांभीर्य नाही.

यावर उपाय म्हणून तिसरीपासून विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा घेऊन त्यांचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ लावली, तर त्यांना पुढच्या इयत्तेत पाठवून मागच्या काही विषयांची परीक्षा पुन्हा घेता येईल. यामुळे परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गांभीर्य निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. मात्र याबाबत कोणताही निर्णय घाई न घेता शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा घेतला जाईल हेही त्यांनी स्पष्ट केले.